Tuesday, February 25, 2020

असा हा सह्याद्री आम्हाला आमच्या बापाप्रमाणे जपतो.



मरहट्ट्यांच्या तख्तावरती हा उभा रांगडा मर्द गडी
ओंजळीत जपलेली कडेकपाऱ्यांची शिदोरी हा आपल्या डोक्यावर मिरवतो.
कुशीत निजलेल्या निसर्गरंगाची उधळण करून हा कातळकडे सजवतो.
असा लोभसवाणा रूपड्याचा सह्याद्री आम्हांला आमच्या बापाप्रमाणे जपतो.

तो खेळतो दऱ्याखोऱ्यात, वाऱ्याची शीळ होऊन बागडतो.
धडपडताना पायावरची हलकीशी जखम होऊन जातो.
कधी नदीपात्रात डुंबतो एका शुभ्र कातळासारखा
तर कधी उंच कडेलोटावर तो वाऱ्यालाही पुकारतो.
सांभाळतो एखादा बाप जसा आपल्या नवजात पिलाला मायेने
तसा हा अखंड सह्याद्री आम्हांला आमच्या बापाप्रमाणे जपतो.

ठेचाळतो ह्याच्याच अंगाखांद्यावर, मात्र पडायची भीती वाटत नाही.
पडलो तरी सराईतपणे उभी राहण्याची हिम्मत तो देतो.
सुवेळाच्या सूर्यास्तात तो ही दंग होतो
तर कधी नेढ्याच्या थंडाव्यात तो ही दोन घटका विसावतो.
एखाद्या निसरड्या वाटेवर सावरतो तो हलकेच तोल
असा हा अजस्त्र सह्याद्री आम्हांला आमच्या बापाप्रमाणे जपतो.

छत्रपतींच्या कर्तबगारीचा एकमेव साक्षीदार तो
ती पराक्रमाची शौर्यगाथा आपल्या रगारगात जो वागवतो.
घडवतो असे लाखो मावळे ह्या शतकोत्तर प्रणालीच्या वारसदारीसाठी
अशा ज्याच्या रूपापुढे दिल्लीचा तख्तही धजावतो.
तो महाराष्ट्राचा सह्याद्री आम्हांला आमच्या बापाप्रमाणे जपतो.

- जान्हवी फुलवरे.

Thursday, February 6, 2020

दृष्टीपलीकडील जग - सांधणदरी.


सह्याद्री हे नाव जरी साडेतीन अक्षरांच असलं तरीही ह्याच्या पोटात राकट, अजस्त्र, कणखर असं मोठं साम्राज्य दडलंय. अनेक रानवाटा, दऱ्याखोऱ्या, घाटवळणं अशी बरीच नवलाई सह्याद्रीच्या कुशीत खेळते. ' सांधणदरी ' हे त्यातलंच एक नवल. निसर्गाच्या गर्द राईत दडलेलं ' सांधणदरी ' हे आश्चर्य आजही कित्येकांना माहीत नाही. अहमदनगर जिल्ह्यातल्या साम्रद गावात पुढे दीड - दोन किलोमीटर नागमोडी वळणं घेत जाणारी ही दरी कोणालाही आपल्या प्रेमात पाडल्याशिवाय राहत नाही. 

नाशिक - अहमदनगर या दोन जिल्ह्यांच्या वेशीवर वसलेलं साम्रद हे गाव आणि इथूनच सुरूवात होते आशियातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी दरी असलेल्या सांधणदरीला‌. मागीलवर्षीप्रमाणे यावर्षाची सुरूवातही सांधणच्याच अंगाखांद्यावर करावी असा बेत ठरला. दिवस होता १७ जानेवारी शुक्रवार. नेहमीप्रमाणे रात्री १०.२२ वाजता मुलुंडहून कसारा लोकल पकडली. माझ्यासोबत माझे ४ मित्रही होते. नवीन वर्षातला पहिला ट्रेक म्हणून उत्साह अफाट होता. त्यातही तो ट्रेक सांधण आहे म्हटल्यावर उत्साह द्विगुणित व्हायला वेळ लागला नाही. मजल - दरमजल करत रात्री १२.३० वाजता कसारा स्टेशनला पोहोचलो. सोबत मोरयाचा २७ जणांचा ग्रुप होताच. प्रत्येकाच्या मनातली उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटत होती. जास्त वेळ न दवडता आम्ही कसारा स्टेशनवरून बाहेर पडलो. नेहमीप्रमाणे शंकरदादा जीप घेऊन अचूक वेळी, अचूक ठिकाणी आमची वाट पाहत होता. ते म्हणतात ना, सवयीच्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगाव्या लागत नाहीत तसंच काहीसं शंकरदादाचं याबाबतीत होत असावं. सामानाची नीट बांधाबांध झाली आणि गणपती बाप्पा मोरया!! म्हणत तीनही गाड्या मार्गस्थ झाल्या. गाडी सुरू होता न होताच Bluetooth कनेक्ट केलं आणि गाण्यांच्या तालावर सांधणचा प्रवास सुरू झाला. १० - १५ मिनिटांत बाबाच्या ढाब्यावर पोहोचलो. चहाने काही जणांची झोप उडविली तर काही जणांची स्वप्नं फक्त सांधणदरी अनुभवत होती. चहामुळे जरा तरतरी आलेली. तेव्हा पुन्हा गाड्या साम्रदच्या दिशेने वळू लागल्या. प्रवास साधारण साडेतीन - चार तासांचा होता. एरव्ही दिवसभर थकून घरी येऊन झोपणारी ही डोकी आज मात्र प्रत्येक तालावर सूर धरत होती. खिडकी उघडताच भयानक थंडी अंगावर येत होती पण एकूण वातावरण पाहता छान वाटत होतं. रस्त्यालगतच्या तलावांत चंद्राचं पडलेलं ते अथांग चांदणं निसर्गाच्या किमयेची साक्ष देत होतं. रोजच्या धावपळीत हरवलेली ही शांतता कुठेतरी दिसत असल्याचा आनंद काही वेगळाच. 

साधारण साडेतीन वाजता आम्ही साम्रद गावात पोहोचलो. गावच्या कमानीलगत जाणारा सरळ रस्ता तुषार दादाच्या घराकडे घेऊन जातो. जशी पेनासोबत शाई ही येतेच तसंच सांधणचा ट्रेक म्हटल्यावर तुषार दादा हा आलाच. साम्रदसारख्या छोट्याशा गावातही मोरयाच्या प्रत्येक माणसाला हवं नको ते सगळं बघणारा मोरया कुटुंबातला आणखी एक हक्काचा माणूस. त्याच्या घरी पोहोचताच सगळ्यांना आराम करण्यासाठी एक खोली आणि सतरंज्यांची व्यवस्था त्याने करून दिली. पहाटे सहा वाजता ट्रेक सुरू होणार होता त्यामुळे एक तासभर चुटका काढायचा ठरवून सगळे गुडूप झाले. पण त्यातही माझ्यासारखी अजून दोन टाळकी झोपायचं काही नाव घेईनात . त्यामुळे शेकोटी लावायची ठरली. त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची जरा जमवाजमव केली आणि भर थंडीत मी, अक्षय आणि ऋतुराज शेकोटी वर हात शेकत बसलो. थोड्या वेळातच पक्ष्यांच्या किलबिलाटाची चाहूल लागली . पाच वाजतच आले होते. सहज म्हणून तुषारदादाच्या घराकडे डोकावलं तर खमंग पोह्यांचा वास सुटला होता. पहाटेच्या प्रहरी अगदी बोचणाऱ्या थंडीत चहा - पोह्यांचं पोटभर सुख फक्त ट्रेक करतानाच मिळू शकतं. दिवसाची सुरूवातच कमाल झाली होती . सर्वांनी चहा - नाश्ता करून घेतला. दुपारच्या जेवणाकरिता दादाने डबे तयार करून दिले आणि सामानाची आवराआवर करून सर्वजण ट्रेक सुरू करायला सज्ज झालो. 

पहाटेचा गारवा, थंड सुटलेला भयंकर वारा, थंडीत गारठून गेलेले हातपाय आणि मनातली सांधणची ओढ असा सगळा गोतावळा एकत्र करून अखेरीस ट्रेकला सुरूवात झाली. हलकंच उजाडायला लागलेलं. दादाच्या घराच्या डावीकडूनच ट्रेकचा रस्ता सुरू होतो. समोर दिसणारा रतनगड आणि रतनगडचा खुटा असं एकंदर दृश्य नजरकैद करून आम्ही चालायला लागलो. जंगलातल्या रस्त्याला सुरूवात झाली. तसा हा रस्ता एकदम सुटसुटीत आणि मोकळा पण अंधार असल्याने जरा दबक्या पावलांनी आम्ही चालू लागलो. थोड्या वेळातच दगडांच्या आकाराची वाढती संख्या बघून जंगल संपत आल्याची जाणीव झाली आणि समोर पाहताच दोन्ही हात पसरून ही सांधणदरी जणू आमच्या स्वागतार्ह उभी होती.

नजरेस पडणारं हे दृश्य कुठे ठेवू कुठे नको असं झालं होतं. एखाद्या लहान मुलाला त्याच्या आवडत्या बागेत घेऊन गेल्यावर आनंदाने हुंदडणाऱ्या त्या बाळासारखी काहीशी अवस्था आमची होती. परंतु सुरूवातीलाच उशीर होऊन चालणार नव्हता. त्यामुळे मनातल्या आनंदाला आवर घालत आम्ही पटापट पावलं उचलायला सुरूवात केली. 

सोबत आलेली सर्व मंडळी अचाट उत्साहाने ट्रेक करत होती. कुणीतरी दरीला न्याहाळत होतं तर कुणी समोर दिसेल तो नजारा मोबाईलच्या कप्प्यात साठवून ठेवत होतं. हे ठिकाण आहेच म्हणा तसं. कुणालाही अगदी सहज आपल्या प्रेमात गुंतवून ठेवणारं. साधारण सात वाजत आले होते. थोडं अंतर कापत आम्ही एका ठिकाणी येऊन पोहोचलो. समोर असलेला १०० मी. पाण्याचा भाग पार करून पुढचं टोक गाठायचं, असं साधारण ते ठिकाण. भर जानेवारीतल्या त्या कडाक्याच्या थंडीत गळाभर पाण्यात चालून सगळं सामान पलिकडे सुखरूप पोहोचवणं हे काही साहसी खेळापेक्षा कमी नव्हतं. परंतु सगळ्या मुलांनी अर्थातच पुढाकार घेतला. पाण्यात सगळ्या मुलांनी उभं राहून पहिली एक साखळी तयार केली. सगळं सामान आधी पलीकडे नेऊन ठेवायचं असं ठरलं. गारठलेल्या पाण्यात सुन्न झालेले पाय स्थिर ठेवून प्रत्येकाने आपलं सारं बळ पणाला लावलं. मुलींनी एकेक करून सामान द्यायला मदत केली आणि अखेर सर्व मंडळी व्यवस्थित पलीकडल्या टोकावर पोहोचलो. त्यावेळी प्रत्येक मुलाचं मनापासून कौतुक वाटत होतं. कारण काही जणांना अक्षरशः थंडी आणि बधीर झालेलं शरीर अजिबात सहन होत नव्हतं. तरीही प्रत्येकाने प्रत्येकाला मदत केली. पाण्यातून बाहेर आल्यावर थोडा वेळ तिथेच थांबलो. सगळ्यांना हुडहुडी भरली होती. मात्र पाण्याचा भाग यथोचित पूर्ण केल्याचं समाधान होतं.

नारायणराव आकाशात तांडव घालण्याअगोदर जमेल तितकं, जास्तीत जास्त अंतर पूर्ण करायचं होतं. त्यामुळे वेळेचं भान राखणंही तितकंच गरजेचं होतं. Rappelling Point दिसेपर्यंत आता काही थांबायचं नाही, असं मनाशी पक्कं केलं आणि पायाची गती मुद्दामच वाढवली. पण दूरदूर वर तरी Rappelling point दिसायचं नाव घेईना. सोबत आलेली काही जणं अगदीच नवखी होती. दरी उतरताना इतकं चालण्याचा हा त्यांचा आगळावेगळा पहिलाच अनुभव असावा. त्यात वाटेतल्या प्रत्येक दगडाने एक ठेच देत अगदी नाकीनऊ आणलेल्या आणि वर रविराज घामाच्या धारा पाझरत होते. पण तरीही कुणी हार मानली नाही, हे विशेषच. 

शेवटी दुपारी १२च्या सुमारास आम्ही Rappelling Point ला पोहोचलो. साधारण एकूण २८ जणांचा जमाव. त्यात अर्धे अगदी नवखे. त्यामुळे Rappelling Point ची उंची बघून प्रत्येकाच्या मनाने जवळजवळ एक धास्तीच घेतली. पण लगेचच Rappelling चा  श्रीगणेशा झाला. दादा प्रत्येकाला कसं उतरायचं हे नीट समजावत होते. सोबतीला आम्हीही होतोच. दिलेला Harness कमरेला घट्ट बांधून आणि डोक्याला हेल्मेट चढवून सारा धीर एकवटवला. मोठ्याने ' गणपती बाप्पा मोरया!! ' अशी आरोळी ठोकली आणि क्षणातच अंगी बळ आल्यासारखं वाटू लागलं. हळूहळू एकेक जण खाली उतरू लागला. धडपडत, ओरडत, थांबत का होईना पण प्रत्येकजण rappelling पूर्ण करत होता. काहीजणं ह्या सगळ्या आठवणी मोबाईलमध्ये बंद करण्यात मग्न होते तर काही जण आपण ही भिंत उतरून खाली आलोय ह्या धक्क्यातून एकमेकांना सावरत होते. 

आता मध्यान्ह उलटून गेलेली. अजून अर्धी दरी उतरायची बाकी होती. आकाशात रविराज अक्षरशः आग ओकत होते. हळूच वाऱ्याची झुळूक येऊन चेहऱ्याला स्पर्श करून जात होती तेवढाच काय तो थंडावा. दादाच्या आगामी सांगण्यानुसार साधारण १० मिनिटांवर दुसरा Rappelling Point होता. पण नेहमीप्रमाणे त्या १० मिनिटांनी आम्हाला चांगलं २० - २५ मिनिटं चालवलं. दुसऱ्या Rappelling Point ला पोहोचलो. तिथून उतरताना अंगावर थंडगार पाण्याचा अभिषेक होणार होता आणि ते पाहून अगदी भर दुपारच्या उन्हात थंडी जाणवायला सुरुवात झाली. खाली मदतीसाठी अक्षय आणि दुर्गेश उभे होते. एकेक करून सावकाशपणे त्या दगडांवरून सगळे व्यवस्थित खाली उतरलो. त्या निसरड्या दगडांवरून तोल जाण्याची शक्यता होती परंतु बाप्पाच्या कृपेने असं काहीही झालं नाही. पाण्यातून बाहेर आल्यावर कडकडून भूक लागली. कईक तासांच्या पायपीटीनंतर उदरभरणाची नितांत गरज होती. बस मग ! सांधणच्या त्या भल्यामोठ्या दगडांवर मोरयाची पंगत बसली. मातोश्री मंडळाने दिलेले जेवणाचे डबे उघडले आणि अगदी मनसोक्त ताव मारत पेटपूजा झाली. तासाभराच्या निवांत आरामानंतर पुन्हा मार्गी चालू लागलो. अजूनही दोन Rappelling Patches पुढे आमची वाट पाहत होते. साधारण दुपारचे चार वाजत आलेले. पाय पटापट उतरू लागले कारण ट्रेक संपत आल्याची कुजबूज कानांवर आली. तासाभराच्या अवधीत दोन्ही Rappelling यशस्वीरीत्या पूर्ण झाले आणि सांधणदरीचं शेवटचं टोक समोर अगदी काही अंतरावर दिसू लागलं. आनंद गगनात मावेनासा झाला. चालण्याचा वेग दुपटीने वाढवून आम्ही शेवटच्या टोकाला पोहोचलो. उत्सुकतेने पटकन मागे वळून पाहिलं. अहाहा ! ती अखंड दरी हसतमुखाने आमच्याकडे पाहत असल्यासारखं वाटलं. तिथेच बाजूला दगडांतून थंड पाण्याचे छोटे छोटे झरे वाहत होते. दिवसभराच्या उन्हात रापलेल्या चेहऱ्यावर चटकन पाणी शिंपडलं आणि अशाप्रकारे ट्रेकची सांगता अतिशय गारेगार झाली. मात्र...

ट्रेक जरी संपला असला तरी प्रवास अजून संपला नव्हता. अजूनही campsite गाठायची होती. बऱ्याच जणांनी campsite च्या जागेबाबत बरेच अंदाज बांधले होते. ट्रेक संपल्यावर समोरच आपली campsite असेल ह्या त्यांच्या गोड स्वप्नावर अगदी पाणी फिरलं. त्यांची ती अवस्था बघून मला हसू आवरेना. कसंबसं त्यांना पुन्हा चालायला तयार केलं आणि सामान पाठीवर घेऊन आमचं बिऱ्हाड campsite कडे रवाना झालं. १० - १५ मिनिटांत आम्ही campsite ला पोहोचलो. आमच्या आधी पोहोचलेल्या मंडळींनी तुषार दादासोबत टेंट लावून तयार केले होते. सायंकाळी ६ वाजताची ती वेळ. पश्चिमेला कोवळ्या किरणांची रंगछटा एखादा रंग सांडावा अशी आभाळात पसरलेली. हलकेच थंड वाऱ्याची झुळूक येऊन मन प्रसन्न करत होती. चोहीकडे नजर फिरवता फक्त आणि फक्त उंचच उंच कातळकडे. त्यांच्या मध्यभागी ही गर्द झाडी आणि त्यांच्या कुशीत सामावलेले आम्ही. ट्रेकचा यथासांग शेवट जर असा होणार असेल तर घेतलेल्या कष्टांचा पूर्णपणे विसर पडतो. सर्वांनी आपापलं सामान टेंटमध्ये नेऊन ठेवलं. ताजेतवाने होऊन सगळे एकत्र बसलो. रात्रीच्या शेकोटीची तयारी करायची होती. त्यामुळे काही मुलं लाकडांचा बंदोबस्त करायला गेली. थोड्याच वेळात अंधार पडायला सुरुवात झाली. जेवणाला अजून थोडा अवकाश होता. त्यामुळे तोपर्यंत थोडी झोप घेऊया असं म्हणून प्रत्येकजण आपापल्या त्या टुमदार घरात शिरलं. मला तर अगदी क्षणार्धात निद्रादेवी प्रसन्न झाली. तासाभराने कसल्यातरी कुजबुजीने अचानक जाग आली. समजलं की मावशी जेवण तयार असल्याचं सांगायला आलेल्या. तसंही भूक तर लागलीच होती. मावशींनी पानं वाढली आणि मोरयाची सर्व मंडळी साग्रसंगीत पंगतीत जेवायला बसली. चुलीवरचा गरमागरम डाळ भात आणि भाजी हीच कदाचित सुखाची व्याख्या असावी ह्याची सार्थ जाण आम्हांला जेवताना झाली. जेवणं आटोपली आणि पंगत उठली. कारण खरी मजा तर आता सुरू होणार होती. जमा केलेली लाकडं एकत्र रचून ठेवली. त्यात आग पेटवली आणि गप्पांच्या मैफलीला सुरूवात झाली. फोनला नसलेलं नेटवर्क, हळूच गाण्याचा येणारा तो शांत आवाज, आजूबाजूचं थंड वातावरण, शेकोटीमुळे मिळणारी ऊब आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा तो असीम आनंद ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छान जुळून आल्या की ही रात्र संपूच नये, असं पुन्हापुन्हा वाटतं होतं. गप्पा, गाणी, गोष्टी, अनुभव ह्यासोबत सांधणचा पहिला दिवस संपला. वेळ जात होती आणि तसतशी झोपेची लक्षणं दिसायला सुरुवात झाली. त्यामुळे काहीजण टेंटमध्ये जाऊन झोपले. परंतु रसिक मंडळींची ही कमी नव्हती. कोणी चांदण्यांनी गच्च भरलेलं आभाळ पाहण्यात गुंग होतं तर कुणी खरं झालेलं हे स्वप्न जगण्यात गुंतलं होतं. बऱ्याच वेळेनंतर डोळ्यांवर झोपेची झापड येऊ लागली. त्यामुळे वेळेचं भान राखून सगळ्यांनी झोपायचं ठरवलं. 

रात्र उलटून गेली. थंडगार वारा सुटल्याने पहाट झाल्याची चाहूल लागली. त्यात ही प्रचंड थंडी. सकाळचे सात वाजत आले होते. त्यामुळे इच्छा नसतानाही हुडहुडत टेंटमधून बाहेर आले. समोर पाहताच अशी सकाळ नेहमी असावी, ही एकच गोष्ट मनात सारखी येत होती. पहाटेचं आल्हाददायक वातावरण आणि सह्याद्रीच्या कुशीत अनुभवायला मिळणारी अशी प्रत्येक सकाळ हा म्हणजे दुग्धशर्करा योगच. 

थोड्या वेळात सगळे तयार होऊन बाहेर बसले. चुलीच्या जाळासोबत दरवळत असणारा Maggi चा वास आणि त्यासोबतच बाजूला उकळी घेत असलेला चहा म्हणजे स्वर्गसुखच अहो ! थोड्या वेळात नाश्ता झाला आणि सामानाची बांधाबांध सुरू झाली. सगळं आवरून झालं. त्या जागेची आठवण म्हणून एक ग्रुप फोटो काढला आणि मनात घर करून बसलेल्या ह्या जागेला अखेर निरोप द्यायची वेळ आली. पाय निघतच नव्हता. राहूया ना अजून दोन दिवस खरंच परत जायची इच्छा नाही, कुणीतरी पटकन बोलून गेलं. पण थांबून चालणार कसं ! पुढचा रस्ता आमची वाट पाहतोय. त्यामुळे सामान उचलून आम्ही डेहणे गावची वाट धरली. Campsite पासून तासभर अंतरावर असलेलं. शहापूर तालुक्यातील मधील डेहणे हे गाव. गाव तसं छोटंसंच तरीही अनेक घाटवाटांचा मध्यभाग असलेल्या डेहण्यात आमचा रविवारच्या जेवणाचा मुक्काम होता. मजल दरमजल करत डेहण्याच्या दिशेने चालू लागलो. चालताना आजूबाजूला नजर फिरवली की अनेक सह्यशिखरे आभाळाशी स्पर्धा करताना दिसत होती. वाटेत लिंबू सरबताचा मोह काही आवरता आला नाही. घोटभर लिंबू सरबताने कमालीचा उत्साह वाढला. सगळेजण पुन्हा नव्या जोमाने चालू लागले. 

नानांचं घर डोळ्यांसमोर दिसत होतं. डेहण्यातले पाटकर मामा म्हणजेच आमचे नाना. नानांचं घर म्हणजे आपल्या घरासारखंच..... अगदी हक्काचं. तिथे कसलीही औपचारिकता नसते. जिथल्या प्रत्येक हाकेला आपुलकीची जोड असते. मोरयाचा सांधणचा ट्रेक नानांच्या घराशिवाय, तिथल्या मायेशिवाय अपूर्ण आहे. मोरयाचं कुटुंब सह्याद्रीत अशाच माणसांच्या सान्निध्यामुळे वाढतंय. त्यात नानांच्या घरच्या चिकन - भाकरीचा बेत म्हणजे अवर्णनीय गोष्ट. अशी गोष्ट जी फक्त अनुभवणाऱ्यालाच समजू शकते. त्यामुळे अजिबात वेळ न दवडता नानांच्या घराच्या दिशेने चालू लागलो. चालताना डाव्या हाताला उभा असलेला आजोबा पर्वत नजरभेट देऊन गेला. गावातली नदी पार केली. गावातली शेतीशिवारं दिसू लागली आणि त्यालगत असलेलं नानांचं कौलारू घरही दृष्टीस पडलं. मी तर धावतंच गेले. ओसरीवर सामान ठेवलं आणि दारात आमचीच वाट पाहत उभ्या असलेल्या नानींना जाऊन भेटले. त्यांच्या त्या एका स्मितहास्याने सारा थकवा पळून गेला. बाकी उरलेली टोळीसुध्दा मागूनच आली. आतल्या खोलीत सामान ठेवलं , पाण्याची तहान भागवली आणि मुलांचा मोर्चा थेट नदीकडे वळला. नदीवर पोहोचताच नदीपात्रात लांबूनच सूर मारला आणि अशाप्रकारे सगळा क्षीण क्षणार्धात नाहीसा झाला. आजूबाजूची गर्द झाडीही तितकीच भुरळ पाडणारी होती. आता सुमारे दीड तास उलटून गेला. कुणीही पाण्यातून बाहेर येण्याचं नाव घेईना. शेवटी भुकेने सर्वांना परतण्यास प्रवृत्त केलं आणि सगळेजण नानांच्या घराकडे परतले. आम्ही मात्र स्वयंपाकघरात बसून नानींशी गप्पा मारत होतो. ह्या सगळ्यात आमचा वेळ कधी निघून गेला, कळलं सुद्धा नाही. 

सर्वजण घरी परतल्यावर नानींच्या मुलीने कोकम सरबत आणून दिलं. त्यावर सर्वजण अक्षरशः तुटून पडले. त्या सरबताची चव अजूनही जीभेवर रेंगाळतेय. नदीत मनसोक्त पोहणं झालं. कोकम सरबताने मन तृप्त केलं. आता फक्त आम्ही जेवणाची वाट बघत होतो. तितक्यात नानींनी जेवण झाल्याची हाक दिली. मग काय ! लगेचच पंगत बसली आणि जेवणाची ताटं वाढली गेली. ताटात वाढलेला चिकन - भाकरीचा बेत पाहून झालेला आनंद इथे शब्दांत मांडता येत नाहीये. निवांतपणे एक - दीड तासात सर्वांचं जेवून झालं. परतीच्या प्रवासाच्या गाड्या येऊन उभ्या होत्याच. ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचा आनंद होताच पण तितकीच ट्रेक संपल्याची खंतदेखील होती. सह्याद्रीच्या सान्निध्यात दोन दिवस कसे निघून गेले हे कळलं सुद्धा नाही. नाना - नानींचा निरोप घेताना डोळे किंचित पाणावले. पुन्हा येऊच अशी खात्री देऊन आम्ही निघालो. 

ह्या प्रत्येक पायपीटीच्या मुळाशी फक्त एकच प्रश्न येतो, आयुष्यात मिळणाऱ्या सर्व सुखसोयी सोडून घाटवाटांमधलं हे मोकाट भटकणं कशासाठी ? उत्तरं बरीच सापडली परंतु कधी स्पष्ट करण्याची तसदी घ्यावीशी वाटली नाही. तसंही ह्या नभमंडपाचं साम्राज्य अफाट. त्याला गवसणी देणारा सह्याद्री हा काही दोन ओळींत मांडण्याचा विषय नाही. त्यामुळेच कदाचित प्रत्येकाने एकदातरी ह्या धुळीत आपले पाय माखवावेत. खरंच हे सह्यकडे रोजच्या धावपळीतलं खरं जगणं वेचून आपल्या ओंजळीत टाकत असतात.


- जान्हवी फुलवरे.
( मोरया ट्रेकर्स. )

हरिश्चंद्रगड - भटक्यांची पंढरी.




गेल्या वर्षभरात मोरया ट्रेकर्ससोबत अनेक ट्रेक केले. पण " हरिश्चंद्रासारखा ट्रेक झालाच नाही, हेच वाक्य सतत कानांवर पडत आलंय. त्यामुळे मनात उत्कंठा होती हरिश्चंद्रगडाला जाणून घ्यायची आणि तो अतिभव्य कोकणकडा नजरेत सामवून घेण्याची. गेल्या वर्षभरापासूनची ही इच्छा मात्र आज पूर्ण होणार होती.
  नाशिक आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांच्या वेशीवर अनेक डोंगररांगा आहेत. अगदी रतनगडापासून अलंग-मदन-कुलंग, सांधणदरी, माळशेज घाट ही ठिकाणंसुध्दा ह्याच पर्वतरांगांमध्ये येतात. ह्याच सर्व डोंगररांगांमध्ये अगदी अलिप्त पण अभेद्य असा कोकणकडा स्वतःच्या उराशी बाळगून उभा असलेला हा ' हरिश्चंद्रगड '. आणि ही मुसाफिरी आहे सह्याद्रीची संजीवनी असलेल्या त्याच हरिश्चंद्रगडाची.
दिवस होता ७ जून शुक्रवार. नेहमीप्रमाणे रात्री कसारा जाणारी शेवटची गाडी पकडली आणि मजल दरमजल करत रात्री १२:३० वाजता कसारा स्टेशनला पोहोचलो. ८ तारीख उजाडली होतीसुद्धा. या ८ जूनचं विशेष असं की मोरया ट्रेकर्सला बाप्पाच्या आशीर्वादाने १ वर्ष पूर्ण झालं होतं. आनंद अनावर होता. उत्साह अफाट होता. त्यामुळे स्टेशनवर केक कापून मोरयाचा पहिला - वहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. दिवसाची सुरुवातच खूप सुंदर झाली. पण त्यामुळे पुढच्या प्रवासाला उशीर करून चालणार नव्हता. त्यामुळे सगळा कार्यक्रम आटोपता घेत आम्ही गाड्यांकडे जायला निघालो. शंकरदादा कधीपासून आमचीच वाट बघत होता. हा शंकरदादा म्हणजे मोरया कुटुंबातील अगदी विश्वासाचा माणूस. वेळेचं महत्त्व जाणणारा आणि त्यामुळेच आतापर्यंत शंकरदादाच्या गाड्यांमुळे कुठल्याही ट्रेकला आम्हाला कधीच उशीर झाला नाही.
      गणपती बाप्पा म्हणत चारही गाड्या सुरू झाल्या. नेहमीप्रमाणे बाबाच्या धाब्यावर थांबलो. थोडावेळ पाय मोकळे झाले. चहाच्या प्रत्येक घोटासोबत हरिश्चंद्र डोळ्यासमोर येत होता.
     प्रवास साडेतीन-चार तासांचा होता. दिवसभराचा थकवा थोडा जाणवत होता. झोप डोळ्यांना झोपवत होती. पण गाडीतला कल्ला झोपून देईल तर खरं!! मोठमोठ्याने लावलेली गाणी आणि गाडीबाहेरचं वातावरण ह्यांत गप्पा रंगून चार तास निघून गेले, कळलंही नाही. प्रत्येक घाट वळणातून गाडी रास्ता काढत चालू होती. गाडीचे दिवे बंद करता वाटेत मध्येच एखाद झाड काजव्यांनी कब्जा केलेलं दिसत होतं. मध्येच शंकरदादा गाडीचे दिवे बंद करून आम्हाला काजवे दाखवत होता. अहाहा!!! जणू आकाशातले सर्व तारे त्या एकाच झाडावर तोडून ठेवले आहेत.
     साधारण साडेतीन-चार वाजता आम्ही पाचनई गावात पोहचलो. पाचनई गावात थोड्या आतल्या वळसाला भास्कर दादाचं घर होतं. त्या घरापाशी सगळ्या गाड्या थांबल्या. लगेचच ट्रेकला सुरुवात करायची होती. सगळ्यांची थोडी आवराआवर सुरू झाली. तरीही पहाट उजाडायला सुरुवात झालीच. साडेपाच वाजता ट्रेक सुरू झाला. सर्व चेहरे अनोळखी पण तरीही प्रत्येकाच्या मनात असणारी हरिश्चंद्राची ओढ मात्र एकच होती. वाहणारी ती थंड हवेची झुळूक चेहऱ्याला अलगद स्पर्श करून जात होती. तर मध्येच थंडी अंगावर शहारे आणत होती. जोश, उत्साह तसाच कायम होता. प्रत्येकाची पाऊलं आणि मनातली ओढ हरिश्चंद्रच्या दिशेनं चालू लागली.
      थोडा वेळ चालल्यानंतर पुढचा रस्ता हा डोंगराच्या कपारीतून जात होता. त्या कपारीतून चालत पुढे जातानाच समोर दिसणारी हिरवी गर्द झाडी भुरळ पाडत होती. भले मोठे उंच डोंगर आणि हिरवी दाट झाडी त्यामुळे त्या कपारीत मोठ्याने ओरडण्याचा मोह काही आम्हाला आवरला नाही. त्यामुळे ‘गणपती बाप्पा मोरयाsss’अशी हरिश्चंद्रावरून बाप्पाला साद घालता आम्हाला आमचाच प्रतिध्वनी (echo) ऐकू आला. खूप छान वाटलं. पण वेळेचं भान राखून  पुन्हा त्या कपारीतून  चालू लागलो.
     रस्ता मध्येच पुन्हा अरुंद होत होता. मध्येच झाडांची गर्द सावली आराम देत होती.तर मध्येच कोवळी सूर्यकिरणं चेहऱ्यावर मारा करत होती. शेवटी मजल-दरमजल करत एक पठारावर पोहचलो.थकवा जाणवू नये म्हणून लहानपणी पाहिलेल्या कार्टून्सची गाणी गात होतो.म्हटल तेवढाच टाईमपास.थोडं अजून वर चालत गेलो.चालण्याच्या गतीमुळे काहीजण पुढे होते तर काही अगदीच मागे. आम्ही ते मागच्या टोळीतलेच एक. पण शेवटी एक झेंडा त्या पठारावर फडकताना आम्हाला दिसला. उत्सुकता इतकी शिगेला पोहचली की धावत जाऊन वर गेलो. पाहतो तर समोर हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर होत.गडावर पोहचल्याचा आनंद आणि महादेवाचं मंदिर पाहिल्याचं समाधान अशी दुथडी भावना मनात येत होती पण तरीही आम्ही काहीजणं समोरच्या पडवीत जरा वेळ थांबलो. लिंबू सरबताने थंडावा आणि आराम दिला. थोडा थकवा आला होता पण मन शांत बसून देत नव्हतं कारण अजूनही कोकणकड्याचं दर्शन अजून बाकी होतं.
     पुन्हा चालायला लागलो. हरिश्चंद्रेश्वराच्या डाव्या बाजूलाच सप्ततीर्थ पुष्करणी  आणि उजव्या बाजूला केदारेश्वराची गुहा आहे. त्याच गुहांच्या मागच्या बाजूने वरच्या दिशेला एक पायवाट पुढे कोकणकड्यावर जाते. आता थकवा पार निघून गेलेला कारण मनातली उत्सुकता एका जागी थांबून देत नव्हती.
  त्याच पायवाटेने पटापट पाऊलं उचलत आम्ही कोकणकड्याच्या दिशेने चालू लागलो. जसजसे पुढे जात होतो तसतसे खाली उतरलेले ढग दिसू लागले. जणू काही कापसाचा एक मोठा बोळाच कोणीतरी आकाशात सोडून दिलाय. शेवटी कोकणकड्याची एक बाजू दिसू लागली. त्या क्षणी मी पायाला भिंगरी मारल्यागत धावत सुटले. ट्रेकला पुढे गेलेले सर्वजण आधीपासूनच कोकणकड्यावर जाऊन ढग-सावल्यांचा खेळ बघत होते. काही जण निवांत नाश्ता करत बसलेले. मी सामान तिथेच ठेवलं आणि कोकणकड्याकडे सुसाट पळत सुटले. आणि...
 आणि शेवटी ते कोकणकड्याचं भव्य रुप साक्षात डोळ्यांसमोर उभं होतं. तो घोंघावणारा वारा, दूरवर पसरलेली ढगांची चादर पण त्यातही निरखून दिसणारी कोकणकड्याची प्रत्येक कडेकपार अंगावर काटा आणत होती. समोरचं सगळं दृश्य डोळ्यांत साठवून घ्यायचं होतं. दूरवर पसरलेले कातळकडे आणि त्यांवर ढगांनी पांघरलेली शाल माझी नजर एकटक बळकावून होते. आनंद ओठी उमटत नव्हता कारण ते सुख जगापलीकडचं होतं.
  तिथे कड्यावरच नथुबाबाची झोपडी आहे. अहो झोपडी कसली, त्या घराच्या प्रत्येक भिंतीला प्रेमाची ऊब आहे. त्यांच्या जेवणाला आपुलकीचा गंध आहे. जागा जरी छोटी असली तरीही माया मात्र अफाट आहे. अशा या नथुबाबाकडेच आमचा दोन दिवसांचा खाण्यापिण्याचा मुक्काम होता. दुपारच्या जेवणाला बराच अवकाश होता त्यामुळे गरमागरम पोहे आणि चहा ह्याचा सगळ्यानी आस्वाद घेतला. जेवण होईपर्यंत पुन्हा हरिश्चंद्रेश्वर - केदारेश्वरला जायचं ठरलं. हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर हे शालिवाहन काळातील आहे, असे मानले जाते. ह्या मंदिराच्या आजूबाजूला एकूण नऊ गुहा आहेत. त्यातली सर्वात प्रशस्त गुहा म्हणजे 'केदारेश्वरची गुहा'. ह्या गुहेत असणाऱ्या पाण्यातील शिवलिंगामुळे ह्या गुहेला महत्त्व प्राप्त झाले आहे. हरिश्चंद्रेश्वराच्या अतिडावीकडे काही गुहा आहेत. गडावर येणारी माणसं तिथे मुक्कामाला असतात. पावसाळ्यात तर ह्याच गुहा प्रत्येक गिर्यारोहकाला आसरा देतात. आजूबाजूचा परिसर आल्हाददायक होता. मंदिराच्या भिंतीच्या डाव्या बाजूला लागून गणपती बाप्पाची मूर्ती आहे. त्याच निमित्ताने बाप्पाची आरती करायची ठरली. संपूर्ण परिसर दुमदुमून उठला. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या आवारात जिवंत झरे आहेत. त्या गुहांमध्ये उतरुन प्रत्येकाने पाण्याची तहान पूर्णपणे भागवली. 
 आता सूर्य डोक्यावर आला होता. उन्हंसुध्दा तापू लागली होती. त्यामुळे आम्ही थोड्यावेळ हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या अतिडावीकडे असणाऱ्या गुहांमध्ये गेलो. त्या गुहा अगदी थंडगार आणि प्रशस्त होत्या. त्यामुळे तापत्या उन्हात विश्राम देण्याचं काम ह्या गुहांनी केलं. तिथेच गप्पा रंगल्या. अखंड बडबड आणि दमशेरासचा आवाज त्या गुहेत घुमत होता. थोड्यावेळानंतर सगळ्यांना कडकडून भुका लागल्या. त्यामुळे आम्ही आमचा गुहेतला मुक्काम  कड्याकडे वळवला. नथुबाबाच्या घराकडे परतलो. पोटात अक्षरशः कावळे कोकलत होते. जेवणाच्या पंगती घरातच बसणार होत्या. घरात शिरताच झणझणीत पिठलं आणि गरमागरम भाकरीचा खमंग वास दरवळत होता. सोबतीला चटणी होतीच. काहीजणांसाठी हा बेत अगदी नवीन होता. तरीही मिटक्या मारत सर्वांनी पिठलं भाकरीवर ताव मारला. पण नथुबाबाच्या आपुलकीने जास्त पोट भरलं. जेवण आवरल्यानंतर सर्वांनी अगदी ताणून दिली. चांगले २-३ तास बरं का! सायंकाळी कड्यावर थंडगार वारा वाहत होता. एकूणच तो सूर्यास्त आणि कड्यावरचं वातावरण पाहता मन अगदी विसावलं. कुठूनतरी आकाशात पक्ष्यांचा थवा दिसत होता. सूर्यसुध्दा मावळतीला आला होता. आकाशात निसर्गाने रंगाची जणू उधळणच केली होती. हळूहळू सूर्य कोकणकड्यामागे अस्ताला जात होता आणि ते रंग आम्ही फक्त आमच्या डोळ्यात साठवत होतो. 

 आता कोकणकड्यावर Camping म्हटलं तर टेंट आलेच. सूर्यास्तापर्यंत सगळ्यांचे टेंट लावून झाले होते. हळूहळू अंधारदेखील पडू लागला होता. Campfire तर करायचीच होती. त्यामुळे पारस, राकेश, मीत, हर्ष, राज आणि अजून काहीजणं ही टोळी जय श्रीराम म्हणत लाकडं शोधायला निघाली. दुपारच्या जेवणानंतर बराच वेळ उलटून गेलेला. त्यामुळे घशाला पाण्याची कोरड जाणवत होती. पण पाणी आणावं कुठून ? हा प्रश्न. पण लगेचच " बाकी जणं लाकडं आणेपर्यंत आम्ही जाऊन पाणी घेऊन येतो " असं बोलून अक्षय, सोनिया, सचिन, गौरव पाणी आणण्यासाठी हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराकडे उतार झाले. ह्याच चार जणांमुळे ३५ जणांची त्या रात्री पाण्याची सोय झाली, ही गोष्ट कायम स्मरणात राहील.

सगळेजण परतले. Campfire लागायची फक्त बाकी होती. पण त्याआधी सर्वांनी जेवण उरकून घ्यायचं ठरलं. मग काय ! एकेक पंगत नथुबाबाच्या झोपडीत जाऊन जेवायला बसली. समोर पानं वाढायला घेतली. जेवण सुग्रासच असणार ह्याची खात्री होती आणि ते खरं ठरलंसुध्दा. पहिला घास तोंडात टाकताच " अहाहा " हीच प्रतिक्रिया उमटली. त्या भाजीची तर चव अजूनही माझ्या जीभेवर रेंगाळतेय. सगळं उरकल्यावर सगळ्या पंगती उठल्या. पुन्हा टेंट्सपाशी आलो.  Campfire लागली आणि मग खरी धमाल सुरू झाली. अंताक्षरी रंगली, भुतांच्या गोष्टी अवतरू लागल्या आणि केवल, हर्षने सगळ्यांना कमाल गरबादेखील शिकवला. सगळ्यांचा पोटोबा छानपैकी झाला होता. त्यामुळे उत्साह दुपटीने वाढला होता. पण आमच्यात अशी एक व्यक्ती होती जिचा उत्साह आजच्या तरुण पिढीला लाजवेल असा होता. ती व्यक्ती म्हणजे सौ. सुरेखा मांजरेकर ऊर्फ आमच्या लाडक्या काकू. संपूर्ण ट्रेकमध्ये काकू जणू आमची आईच झाली होती. अफाट माया आणि तितकीच काळजीसुध्दा. तिचा उत्साह कमाल होता आणि शेवटपर्यंत तो कुठेही कमी झाला नाही. अशाच सगळ्या भन्नाट लोकांसोबत रात्र कधी उलटून गेली कळलंही नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता टेंटमधून बाहेर पडलो तर धुकंच धुकं पसरलं होतं. थंडी अक्षरशः टोचत होती. पण तरीही सर्वजण तयार होऊन बाहेर आले कारण थोड्या वेळातच तारामती शिखर गाठायचं होतं. आम्ही सर्वजण चालू लागलो. कोकणकड्याच्या अतिडावीकडून एक सरळ रस्ता जातो. त्याच रस्त्याला पुढे चालत गेल्यावर डावीकडे एक मोठी गुहा दिसते. पावसाळ्यात तिथून कोसळणारा धबधबा अतिसुंदर दिसतो. तीच पायवाट पुढे चढणीला मिळून जाते आणि तिथून तारामतीचा रस्ता सुरू होतो. धुक्यात हा रस्ता शोधणं थोडं अवघड होतं. पण तरीही वाट काढत ते जंगल पार झालं. वरच्या बाजूला आल्यावर समोर शिडीचं दर्शन झालं. वरच्या पठारावर जाण्याकरता शिडीचा उपयोग केला जात असे. त्या शिड्यांची अवस्था काही फारशी चांगली नव्हती. तरीही ती शिडी सगळ्यांनी पार केली. शिडीच्या बाबतीत एका मुलाचा उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे आमच्या ग्रुपमधला ओम धाडवे. इयत्ता सातवीत असलेला ओम हा मोरया कुटुंबात सगळ्यांत लहान. तरीसुद्धा भीती नावाचा प्रकार त्याने दाखवला नाही. पण शिडी चढताना मात्र ओमचे पाय थरथरू लागले. पण जिद्दीने माघार घेता त्या दोन्ही शिड्या ओमने पार केल्या. ह्या गोष्टीचा आनंद काही वेगळाच. साधारण एक - दीड तासात आम्ही तारामती शिखर गाठलं. तारामतीवरून दिसणारा हरिश्चंद्रगड हा शब्दांत व्यक्त न करता येण्यासारखा होता. ह्या ट्रेकला सोन्याहून पिवळं करणारी घटना म्हणजे ' इंद्रवज्र '. इंद्रवज्र म्हणजे निसर्गाची अचाट कमाल. जेव्हा काळे ढग आकाशात गर्दी करतात आणि त्या ढगाआडून सूर्यप्रकाशामुळे आपली सावली समोर असलेल्या ढगांवर पडते. तेव्हा आपल्या सावलीभोवती तयार होणारं अर्धवक्रीय इंद्रधनुष्य म्हणजे इंद्रवज्र होय. कोकणकड्यावरून दिसलेलं पहिलं इंद्रवज्र हे सर्वांना दिसू शकलं नाही. कारण ती किमया काही सेकंदापुरतीच होती पण तारामतीवरून चक्क दोन वेळा इंद्रवज्र दिसलं. आमच्यासाठी तो मोठा भाग्याचा क्षण होता. तो क्षण आम्ही कधीच विसरू शकत नाही. 
 तारामती शिखरावर एक शंकराची पिंड आहे. त्यावर एक भगवा झेंडा फडकताना दिसतो. शिखरावर पोहोचताच तिथे महाराजांचा गजर चालू होता. त्यानंतर आम्हीही शिवगर्जना मानवंदना दिली. एकूणच तिथलं वातावरण पाहता प्रसन्न आणि छान वाटत होतं. पण ह्या सर्व गोष्टींमध्ये वेळेचं भान सोडून चालणार नव्हतं त्यामुळे आम्ही कोकणकड्याच्या दिशेने उतरू लागलो. नथुबाबाच्या घरी परत आलो. नाश्ता झाला. कोकणकड्याची एक आठवण म्हणून एक ग्रुप फोटो काढला आणि सामानाची आवराआवर करून नथुबाबाचा निरोप घ्यायला गेलो. २ दिवस अगदी मायेने, आपुलकीने त्याने आम्हाला जेवू घातलं. आम्हाला हवं नको ते सगळं पाहिलं. निघताना बाबाने अक्षय, पारस आणि दुर्गेशला घट्ट मिठी मारली. हे प्रेम सह्याद्रीशिवाय दुसरीकडे कुठेच सापडणार नाही.

 हरिश्चंद्रगड आणि मोरया ट्रेकर्स ह्यांचं एक वेगळं नातं आहे. हरिश्चंद्रगडाने दरवेळेस मोरयाला भरभरून आशीर्वाद दिलेत. तिथे असलेल्या प्रत्येकासोबत एक नातं तयार झालंय. खरंतर माणसं जोडण्याची ताकद सह्याद्रीच आपल्याला देतो. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळताना पडायची भीती ठेवायची नसते. कारण तो भरभक्कम बापाप्रमाणे आपल्या पाठीशी उभा असतो. त्यामुळेच बाकी आयुष्याचं रहाटगाडं फक्त चालू असतं पण सह्याद्री खरं जगायला शिकवतो. त्यामुळेच मनात नसतानाही हरिश्चंद्राचा निरोप घेणं भाग होतं. म्हणून उदरभरण होताच मनात आठवणींची पुंजी जमा करीत आम्ही ९ जूनला दुपारी गडउतार झालो.

                                                                                                                  - जान्हवी फुलवरे.
                                                                                                                     ( मोरया ट्रेकर्स. )