Monday, March 23, 2020

वारी सह्याद्रीतल्या दुर्गत्रिकुटाची !! - भाग १

रविवारचा तो दिवस. जणू बाकी सहा दिवसांच्या धावपळीचा आलेख थोडा छोटा करून निवांतपणाची गोळी घेऊन निपचित पडून राहण्यासाठी नेमलेला हा तात्पुरता पाहुणा. त्यामुळे ह्या दिवशीसुद्धा पायाची तंगडतोड करून ' फुकट ' शरीराचे हाल करून घेण्याची व्याख्या अर्थातच आमच्या मागच्या पिढीला पटत नाही. असो. ही झाली प्रसंगाची प्रस्तावना. मूळ प्रसंग सुरू होतो तो आता.

" ह्या रविवारी गप्प घरी बस. सकाळी घरची कामं आवरून संध्याकाळी दादाकडे जायचंय. " स्वयंपाकघरातून मातोश्रींचा दरवडणारा आवाज कानांवर पडला आणि रविवार तर सोडाच पण शुक्रवार - शनिवारचाही ट्रेकचा बेत ठरवून बसलेल्या मला आईला कुठल्या तोंडाने सांगू ह्याच विचाराने धडकी भरली. परंतु ह्यावेळी थोडं धाडस करणं गरजेचं होतं कारण हा ट्रेकही माझ्यासाठी तितकाच खास होता.

बहुतेक बऱ्याच जणांचं स्वप्न असणारा हा ट्रेक माझ्या नशिबी इतक्या लवकर येईल, हे वाटणं थोडं अजबच. पण मोरयामुळे माझं हे एक स्वप्न लवकरच पूर्ण होणार होतं. होय. ही मोहीम आहे सह्याद्रीतल्या त्या दुर्गत्रिकुटाची जिथे दुर्गमता - सुंदरता - अजस्त्रता ह्या तीनही विशेषणांचा संगम होतो - अर्थातच सह्यरांगेतील अलंग - मदन - कुलंग ह्या दुर्गमाळेची.

नाशिक प्रदेशात हरिश्र्चंद्रगडाच्या दिशेने गाडी वळवता नजरेस पडणारी अनेक दुर्गशिखरे आपली ओळख पटवून देतात. अगदी कळसूबाईपासून ते थेट रोहीदास शिखरापर्यंत. जिथवर नजर जाईल तितक्या दूरवर दिसणारी सह्यशिखरे ह्यापेक्षा मोठे नयनसुख काय अहो ! त्यातलीच अलंग - मदन - कुलंग ही दुर्गमाळ कळसूबाईशेजारी आपले अस्तित्व टिकवून तटस्थ उभी आहे. बेफाम उंचीचे कातळकडे आणि टप्प्या - टप्प्याला अवघड होत जाणारी पायवाट ह्या दोन्ही बाबींमुळे अलंग - मदन - कुलंग अर्थातच सर्वपरिचित असलेला AMK करताना शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसून पायपीट होते. त्यामुळे अनेकांकरिता AMK हे फक्त एक स्वप्नच राहून जातं. 

मला मात्र हे असं होऊन द्यायचं नव्हतं. एकदा ओघाओघात अक्षय बोलून गेला , " सांधणनंतर AMK करून येऊ. " आणि माझ्या डोक्यात AMK ची स्वप्नं रंगायला हे इतकं निमित्त पुरेसं होतं. झालं तर मग. मोहिमेची रूपरेषा ठरली आणि १४ फेब्रुवारीला रात्री ११.३० ची कसारा लोकल पकडून आम्ही या मोहिमेचा श्रीगणेशा केला. पार शिगेला जाऊन पोहोचलेला उत्साह आणि तितकीच.. कदाचित त्यापेक्षा थोडी जास्त भीती अशी एकंदर खिचडी माझ्या मनात शिजत होती. 
साधारण रात्री दीड वाजता कसारा स्टेशनवरून बाहेर पडलो. नजर पहिले ' माऊली ' गाडी शोधू लागली. ' माऊली ' म्हणजे आमची नेहमी ट्रेकसाठी ठरलेली शंकरदादाची गाडी. अरे हो ! एव्हाना तुम्हाला ह्याबद्दल एक पुसट अंदाज आलाच असेल म्हणा. 
                 

पण ह्यावेळी मात्र गाडी वेगळी होती. फार उशीर करून चालणार नव्हता. पटापट सामान गाडीत चढवलं आणि गाडीची चाकं आंबेवाडीच्या दिशेने धावू लागली. नेहमीप्रमाणे चहाकरिता बाबाच्या ढाब्यावर थांबलो. चहाच्या प्रत्येक घोटासोबत सह्याद्रीचं सजलेलं ते अफाट रूप कल्पनेत रेंगाळत होतं. कसाराहून आंबेवाडी हे अंतर काही फार नाही. त्यामुळे तासाभरातच आम्ही आंबेवाडी गावात पोहोचलो. डोंगराच्या कुशीत विसावलेलं हे गाव साखरझोपेत असल्याची जाणीव झाली. बघतो तर पहाटेचे ३.१५ वाजलेत. अतिशय सुंदर आणि रांगड्या अशा ट्रेकची सुरुवात ब्राम्हमुहुर्तावर होत असल्याचं काय ते एक धार्मिक समाधान. 

कैलास दादाच्या अंगणातच गाडी थांबवलेली. घरापाशी जाऊन दादाची भेट घेतली. त्याने सामान आवरायला घेतलं आणि तितक्याच वेळेत आम्ही सगळेच अंगणात जरा पहुडलो.

 ३ वाजून ४५ मिनिटे. फेब्रुवारी महिन्यातला उरला - सुरलेला थंडावा वातावरणात जाणवत होता. कैलास दादाने हलक्याच आवाजात " दादा निघायचं का ? " म्हणून विचारलं आणि ' गणपती बाप्पा मोरया ' म्हणून आम्ही अलंग गडाच्या दिशेने चालू लागलो. 
आजूबाजूला काळाकुट्ट अंधार. समोर फक्त अंधुक चंद्रप्रकाशात चाचपडत दिसणारा डांबरी रस्ता आणि समोर अलंग - मदन - कुलंग यांचे दिसणारे माथे - पुसट अशा रेषाच जणू ! वाट नेईल तसे आम्ही चालू लागलो. काही वेळातच एका माळरानावर येऊन पोहोचलो. समोर चढणीचा रस्ता जंगलातून वर जाताना दिसत होता. खांद्यावर बॅग, हातात दोन दिवसांची पोटापाण्याची व्यवस्था आणि नजरेत AMK पूर्ण करण्याची जिद्द असा सगळा गोतावळा एक करून आम्ही जंगलातून वर चढाईला सुरुवात केली.  दूरवरून अलंगच्या गुहेतून टॉर्चचा दिवा चमकताना दृष्टीस पडू लागला. हे अंतर काही जास्त लांब नाही, ह्या एका गोष्टीने हायसं वाटलं मात्र जंगलातल्या खड्या चढाईने सगळ्यांचाच घाम काढला. 

थोडा वेळ तिथेच थांबलो. आधी त्या पोटातल्या भूकेला शांत केलं. आजूबाजूला नजर फिरवता नजरेस पडलं चंद्राचं ते शीतल चांदणं. त्या मंद प्रकाशात डाव्या हाताला उभे असलेले नवरा - नवरीचे सुळके आणखी सुंदर दिसू लागले. कसं सगळं अगदी शांत वाटत होतं. दूरवर चकाकणारी शहरातल्या गजबजाटातली नकोशी गर्दी आणि तिला दूरवरून पाहत उभे असलेले आम्ही - ह्या सगळ्या गोंगाटापासून लांब. दोन दिवसांपुरता का होईना पण हे पदरात पडलेलं सुख पाहून समाधान मिळालं. तेवढ्यात अक्षयने वरून हाक दिली. तांबडं फुटायच्या आधी गुहेपाशी पोहोचायचंच होतं. त्यामुळे सरसर चढायला सुरुवात केली. जंगल संपताच अलंगच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसू लागल्या. अगदी उतार नाही परंतु साधारण ६०° कोरलेल्या पायऱ्या आणि त्यात रात्रीचा अंधार. अंदाज चुकून तोल गेला तर डायरेक्ट शिफ्ट डिलीट. म्हणून जरा जपूनच अंदाज घेत चालू लागलो. 

अरे ! ह्या कातळी पायऱ्यांच्या आधी पाहिलेल्या एका विशेष गोष्टीचा उल्लेख करायचाच राहून गेलं. ते म्हणजे अलंग गडावरील पायऱ्या सुरू होण्यापूर्वी कातळात कोरलेलं दुर्गदेवतेचं मंदिर. ह्या ट्रेकला सुरुवात करण्यापूर्वी ह्या दुर्गदेवतेचा आशीर्वाद घेऊन पुढे जाण्याची परंपरा असल्याचं कैलास दादाने विस्तारीत सांगितलं. दुर्गदेवतेच्या उजव्या बाजूस कोरलेलं शिल्प अलंग - मदन - कुलंग ह्या तीनही किल्ल्यांची सुरुवात येथूनच होते, असे दर्शवते. 

त्या दुर्गदेवतेसमोर ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण होऊदेत अशी इच्छा व्यक्त केली आणि आम्ही पुढे चालू लागलो.
साधारण सहाच्या सुमारास गुहेपाशी पोहोचलो. आवश्यक तितकंच सामान बरोबर घेतलं आणि बाकी सर्व बॅग्स गुहेत काही वेळा करिता मुक्कामास ठेवल्या. पुढे वर जाण्यासाठी कुठला रस्ता असेल ह्याची मला भलतीच उत्सुकता लागून राहिलेली. पुढे जाऊन बघते तर एक कातळटप्पा आम्ही येण्याचीच वाट पाहत होता. उंची तशी साधारण होती. जागोजागी आधारासाठी बऱ्याच खाचा आणि बोल्टस् होते. पहिले कैलास दादा वर चढून गेला. अगदी डोळ्याची पापणी मिटावी तितक्या क्षणार्धात तो वर पोहोचला देखील. ' तुला जमणार आहे हे. चल पटापट ' असा स्वत:लाच धीर देत पहिली भिंत पार केली. जरा हायसं वाटलं. पण आनंदाला सुरूंग लावल्यासारखा दुसरा कातळटप्पा समोर आला. पहिल्या टप्प्याच्या मानाने अफाट उंची आणि पूर्णतः सपाट सरळ. हे कसं होणार ए आपल्याकडून ? हा मनात आलेला पहिला प्रश्न. पण आता आलोय तर केल्याशिवाय गत्यंतर नाही हे ही तितकंच खरं होतं.

त्यामुळे मनातला सगळा धीर एकवटून harness घातलं. गणपती बाप्पा मोरया म्हणत लोंबकळणारा दोर हातात घेतला आणि कातळटप्पा चढायला सुरूवात केली. थोड्यावेळातच पाय थोडे कापू लागले. दोर सोडून द्यावी जे होईल ते होईल असंही एका क्षणी मनात आलं. परंतु अर्थातच ही अशी हार मानण्यासाठी मी ह्या ट्रेकला आले नाहीये, असं स्वत:लाच समजावलं. अगदी धीराने एकदाचा तो कातळटप्पा पार केला. वर पोहोचल्यावर आनंदाला पारावार राहिला नाही. त्यानंतर माझ्या मागूनच अक्षय, दुर्गेश, सोनिया ही सारी मंडळी एका मागोमाग एक वर आली. 

 वेळ न दवडता पुढच्या पायऱ्या चढायला सुरूवात केली.

एव्हाना सूर्यनारायणाचीही सकाळ व्हायला सुरूवात झाली होती. साधारण १५ मिनिटांत पायऱ्या चढून अलंगच्या माथ्यावर पोहोचलो. समोर पाहताच सबंध सपाट पठार. आकाशात जणू रंगपेटीतला पिवळा आणि केशरी रंग एकत्र सांडावा असं काहीसं दृश्य होतं. त्यावेळची माझी मनोवस्था मी इथे शब्दात मांडू शकत नाहीये. 

पुढे चालू लागताच डाव्या बाजूला छोटं पाण्याचं टाकं दृष्टीस पडलं. समोर छोटेखानी गुहा दिसू लागली. वाटेतली लाकडं गोळा करत गुहेपाशी पोहोचलो. लाकडांची चूल पेटवून चहाचं आधण ठेवलं. चहा होईस्तोवर नाश्ता तयार ठेवावा म्हणून मी आणि सोनिया ब्रेड जाम बनवत बसलो. चूलीवरच्या चहाचा घमघमाट संपूर्ण गुहेत पसरला. कडकडून भूक लागली होती.

चहा - नाश्ता करून घेतला. अजून अलंगचा पूर्ण माथा पाहायचा बाकी होता. कैलास दादा मात्र गुहेपाशीच थांबला. आम्ही वेळ वाया न घालवता माथ्याच्या दिशेने निघालो. गुहेच्या डाव्या बाजूने वर जाण्यासाठीचा रस्ता आहे. साधारण दहा मिनिटांच्या चालीनंतर पठारावरील शेवटच्या टोकावरचा भगवा फडकताना दिसतो. मात्र त्याआधी समोर दिसणारं मनमोहक दृश्य नजरकैद केल्याशिवाय मन राहवत नाही. ते दृश्य आहे अलंगगडावरून मदनगड आणि कुलंगगड ह्यांच्या होणाऱ्या नजरभेटीचं.

काय ते सुख! शब्दांत न मांडता येण्यासारखं आणि जगावेगळं. सूर्यप्रकाशाच्या तिरप्या रेषा छेदत अखंड असा उभा सह्याद्री मला अलंग - मदन - कुलंग ह्यांच्या रूपात पाहायला मिळतोय, ह्यातच मी स्वत:ला भाग्यवान समजलं आणि मी पुढे चालू लागले. समोर दिसणारा घाटघर जलाशय सूर्यकिरणं पाठीवर लेवून अगदी दिमाखात चकाकत होता. डाव्या हाताला किरडा आणि दूरवरचं कळसूबाईचं दर्शन, हीच ती सुखाची परिसीमा.

अलंगच्या माथ्यावर राजवाड्याचे पडके अवशेष आणि पाण्याच्या टाक्या आहेत. त्या बांधकामाला पाहून पुरातन स्थापत्यकलेला मनापासून दाद द्यावीशी वाटते. त्यामुळेच ह्या ठिकाणी मात्र फोटो काढण्याचा मोह काही आवरला नाही.

थोडेफार फोटो काढले. भरपूर मजा आली. तरीही समोर फडकणारा झेंडा मात्र एका जागी शांत थांबू देत नव्हता. सरसर पावलांनी वर पोहोचतोयच इतक्यात समोर नजर गेली. सगळ्या पर्वतरांगा एकेक करून आपली ओळख पटवून देत होत्या. सर्वप्रथम नजर खिळली रतनगडाच्या खुट्यावर. त्यामागे सांधण दरी. खाली शिपनूर. रतनगडामागे हलकेच नजर चुकवत उभे असलेले गवळदेव, घनचक्कर आणि मुडा पर्वत. नजरेच्याही टप्प्यात नसलेला धुक्यातला हरिश्र्चंद्रगडही हळूहळू आपली झलक दाखवू लागला. सांधणदरीमागेच बराचसा खजिना आपल्या पोटात सामावून उभा असलेला आजोबा पर्वत आणि त्या शेजारी कुमशेत. किती आणि अजून काय काय सांगू ! ही न संपणारी गिरीशिखरांची मांदियाळी म्हणजे गिर्यारोहकांसाठीची मेजवानीच जणू ! एका भल्यामोठ्या ताटात सगळ्या प्रकारची मिठाई एकसमवेत ठेवावी, असा काहीसा हा प्रकार माझ्यासोबत घडला आणि त्यामुळे अजून बरेच तास मी तिथेच बसून रहायला तयार होते.

परंतु प्रश्न होता वेळेचा. त्यामुळे आम्ही अलंगच्या माथ्यावरून उतार व्हायला सुरूवात केली. साधारण सकाळचे १०.३० वाजले असावेत. जरा दिशेला नजर भिरकवावी, त्या प्रत्येक दिशेने अलंगची एक वेगळी बाजू दृष्टीस येत होती. अलंग - मदन - कुलंग मधील सर्वात विशाल गड हा अलंग याची सार्थ जाणीव त्यावेळी झाली. पटापट खाली उतरत गुहेपाशी आलो. 

कैलास दादा त्याचं सामान घेऊन तयारच होता. आम्ही अलंगवरून गडउतार व्हायला सुरूवात केली. एव्हाना उन्हाची हलकीशी झळ बसायला सुरुवात झाली होती. उतरताना समोर असलेल्या टाक्यांतून पिण्याचं पाणी भरून घेतलं. सूर्याचा आकाशात कहर सुरू होण्यापूर्वी मदनगडावर पोहोचायचं होतं. त्यामुळे जरा घाईनेच पाऊलं उचलायला सुरूवात केली. खाली येताच पायऱ्या सुरू झाल्या. इथे पायऱ्यांचा उतार तीव्र असल्याने जरा सावकाशीनेच घेतलं. बोल्ट्समध्ये जाड दोर बांधून ठेवलेलीच. त्याच्या आधाराने एकेक पायरी हळूहळू उतरू लागलो. 

पायऱ्या संपताच सरळसोट कातळीभिंत समोर आली. थोड्या वेळापूर्वी जी भिंत चढून वर आलो, आता तीच भिंत खाली उतरून डाव्या बाजूने मदनगडाच्या रस्त्याला सुरूवात होते. एका पाठोपाठ Rappel करत ती भिंत उतरून खाली आलो. त्यानंतर खाचा आणि बोल्टस् असलेला कातळटप्पाही पार केला. गुहेत बराच वेळ मुक्कामाला ठेवलेल्या आमच्या बॅग्स बरोबर घेतलेल्या आणि वेळ न दवडता आमची स्वारी मदनगडाकडे निघाली.

दोन्ही बाजूला वाढलेलं उंचच उंच गवत आणि वेळेनुसार निमुळती होत जाणारी पायवाट - ह्यात भर म्हणून डोक्यावर उन्हाची झळ ह्या सगळ्यांनी अक्षरशः पिट्ट्या पाडला. कसाबसा तो गवताळ रस्ता संपवला आणि पुढे डोंगरातील कपारीच्या रस्त्याला लागलो. कपारीतून जाणारा तो रस्ता पाहून मन पटकन हरिश्र्चंद्रगडावर जाऊन पोहोचलं. पाचनईवरून हरिश्र्चंद्र करताना अशाच एका कपारीतून वर जावं लागतं.
चालताना समोर एक टपरीवजा दुकान दिसलं. भर उन्हात चालून चालून संपूर्ण शरीर थकलं होतं. भूकही तितकीच लागली होती. म्हणून दुपारचं जेवण इथेच उरकून घ्यावं, असं एकमताने ठरलं. सामान बाजूला ठेवलं. प्रत्येकाच्या बॅगमधून पंगतीतला एकेक पदार्थ हळूच डोकावू लागला. थेपले - चटणी, सफरचंद - संत्री, चकली - चिवडा अशी बरीच खाद्ययात्रा उदरभरण करून आम्ही थोडे सुस्तावलो. इथेच थांबूया थोडावेळ असं कोणीतरी - अर्थात मी सुचवलं. पण दुपारचा सूर्यनारायण तापायच्या आत मदनगडावर पोहोचायचं होतं, हे ही तितकंच खरं. त्यामुळे सामान आवरलं आणि आमची पावलं पुन्हा पुढच्या वाटेवर रुळली. 

पुन्हा काहीसा गवताळ रस्ता पार केल्यावर एका ठिकाणी पायवाट संपते. तिथे मात्र खूप काळजीने, अगदी सतर्क राहून पाऊल पुढच्या खाचेत टाकायचं होतं. एक निष्काळजीपणा आणि अखंड माणूस सामानासकट दरीत. ही जागा ' मदनगडावरील ट्रॅव्हर्स ( Traverse ) म्हणून ओळखली जाते. त्यामुळे जास्त धोका न पत्करता दोर बांधून सावकाशपणे पाऊल पुढे टाकत गेलो. पुढे थोडं चालत गेल्यावर पुन्हा समोर आला एक कातळटप्पा. अलंगगडाप्रमाणेच, तितक्याच उंचीची ही कातळीभिंतसुध्दा दोरीच्या सहाय्याने चढून पार करायचा होता. Harness घट्ट केलं. दोर हातात घेतला आणि भिंत चढायला सुरुवात केली. यावेळी मात्र अजिबात भीती वाटली नाही. आम्ही फक्त सात जणं होतो. त्या टप्प्याला आमच्यासोबत दुसरा ग्रुपदेखील होता. त्या भिंतीला मात्र एकावेळी दोनच दोर लावणे शक्य होतं. त्यामुळे आम्ही जास्त उशीर न करता भिंत चढून एकेक जण वर जाऊन थांबलो. पुढे जाऊन बघतो तर पुन्हा पायऱ्याच होत्या. आता मात्र कधी एकदाचे गुहेत पोहचून सामान टाकतोय असं वाटत होतं. कैलास दादाने अजून दहाच मिनिटे चालायचंय, असं हळूच सांगितलं. हे कळताच पायांचा वेग दुपटीने वाढला. समोर पाण्याचं एक भलंमोठं टाकं दिसलं. तेवढ्यात कैलास दादाने वरच्या बाजूस असलेली गुहा दाखवली. आमच्या आनंदाला जणू पारावार राहिला नाही. धावत वर गुहेत जाऊन पोहोचलो. सामान तिथेच ठेवलं. पहिले खाली मॅट अंथरली आणि जरावेळ तिथेच बसलो. 

अहाहा ! त्यावेळी आमच्या मनाची असलेली अवस्था अचूक सांगू शकणाऱ्या शब्दाच्या मी अजूनही शोधात आहे दुपारचा साधारण दीडचा प्रहर. टाक्यातून पाणी आणून हात - पाय, चेहरा धुऊन घेतला. अर्थातच पाण्याचं टाकं खराब होणार नाही ह्याची पहिली काळजी घेतली. चुलीसाठी लाकडं शोधून चूल पेटवली. त्यावर पाण्याचं आधण ठेवलं आणि अशाप्रकारे आमचा मॅगीचा बेत ठरला. उन्हात चालून चालून फार थकलो होतो. त्यामुळे चुलीच्या जाळासमोर जाण्यास कोणीही तयार होईना. त्यामुळे शेवटी मॅगीची जबाबदारी अक्षय आणि शंकरने घेतली.
आम्ही तोपर्यंत आतल्या सामानाची व्यवस्थित आवराआवर करायला घेतली. मॅगी होईपर्यंत टेंट लावून घेतला आणि मग गरमागरम मॅगीवर मनसोक्त ताव मारला.

गुहेतलं थंड वातावरण, तृप्त झालेलं पोट आणि दिवसभरातली पायपीट ह्यामुळे आम्ही सगळेच अक्षरशः पेंगू लागलो. दुपारच्या झोपेची म्हणजेच ' वामकुक्षीची ' नितांत गरज होती. त्यामुळे मागेपुढे न पाहता अंग टाकताच प्रत्येकजण झोपेच्या अधीन झाला. तेही अगदी गाढ. 
संध्याकाळ साडेपाचची वेळ. अचानक कुणालातरी जाग आली असावी. मी तर तेव्हाही झोपेतच होते. त्यामुळे फारसं स्पष्ट काही आठवत नाही. बाहेर फक्त हलक्या ताबूंस रंगाने भरलेलं आकाश दिसत होतं. तितक्यात बाहेरून कोणीतरी आवाज दिला, " सूर्यास्त पाहायचा असेल तर लवकर वर ये." मी लगेच उठून गुहेबाहेर आले. तोंडावर थोडं पाणी शिंपडलं आणि लगेच मदनच्या माथ्यावर जायला निघाले. बाकी सर्व केव्हापासून तिथेच बसले होते. गुहेपासून माथ्याचं अंतर जास्तीत जास्त दोन मिनिटांचं. सूर्यास्ताच्या रंगछटेने संपूर्ण आभाळ न्हाऊन निघालेलं. ज्या क्षणांसाठी ही इतकी पायपीट करून इथवर पोहोचलो ते सारं सार्थकी लागल्यासारखं वाटत होतं.
अखेरीस सूर्यास्त झाला. अखंड दिवसाच्या धावपळीनंतर तो रवीकिरणही सह्याद्रीच्या कुशीआड विसावला. आकाशात ताऱ्यांची लुकलुक सुरू झाली. एखाद्या चित्रकाराने केशरी, पिवळ्या, निळ्या रंगांनी आपला कॅनव्हास सजवावा, तसं काहीसं दिसणारं हे विहंगम दृश्य आम्ही डोळ्यांत सामावून घेत राहिलो. पण तोवर अंधार पडायलाही सुरुवात झाली होती म्हणा. रात्रीच्या जेवणाची सगळी तयारी बाकी होती. त्यामुळे जरा वेळेचं भान राखून गुहेपाशी परतलो. वरणभात - भाजी - पापड - लोणचं - गोडाचा शिरा हा होता रात्रीच्या जेवणाचा बेत. त्यानुसारच पटापट तयारीला लागलो. लाकडं आणूनच ठेवली होती. त्याच्याच दोन चुली मांडल्या. त्यांवर तांदूळ आणि डाळीचं आधण ठेवलं. अक्षय आणि शंकरने परंपरेनुसार जेवणाची जबाबदारी घेतली. दुसरीकडे सोनिया आणि मी भाज्या चिरून द्यायचं काम करत होतो. जेवणाला वेळ लागणारच होता. तेवढ्या वेळात दिपक आणि दुर्गेश पाणी आणण्यासाठी टाक्यांपाशी गेले. अनुक्रमे डाळ, भात, भाजी शिजत आल्यावर रवा भाजायला घेतला. जेवणाचा खमंग वास आत गुहेतही पसरला. 

शेवटी भाजीचं पातेलं खाली उतरवून वरणाला फोडणी दिली. शिरा तयार झाल्यातच जमा होता. एकीकडे जाळावर पापड भाजून घेतले आणि अशाप्रकारे साधारण रात्रीचे साडेनऊ वाजता आमची जेवणाची पंगत बसली.
आम्ही बनवलेल्या जेवणावर आमचाच विश्वास बसेना. जेवणाला काहीतरी वेगळीच चव आली होती. अजूनही ती चव जिभेवर रेंगाळतेय. जेवणं आटोपली आणि भांड्यांचा पसाराही लगेहात आवरून घेतला. अंथरूणं आणि रजई काढून ठेवून दिल्या आणि रात्री दहाच्या सुमारास गुहेबाहेर मॅट टाकून गप्पांचा बेत रंगला. थंडावा देणारं चंद्राचं चांदणं आणि तारे माळून लगडलेलं ते आकाश आणि त्या सुंदर वातावरणात चेहऱ्याला अलगद स्पर्श करून जाणारी वाऱ्याची हळुवार हालचाल ह्यापेक्षा जास्त काय हवं असतं एखाद्याला! हे सारं सुख अनुभवायलाच सह्याद्रीत यावं हे अगदी मनोमन पटलं. थोडी थंडी जाणवायला लागली म्हणून शेकोटी पेटवली. 

त्यावर हात शेकवत अगदी मनसोक्त गप्पा मारल्या. बऱ्याच दिवसांनी असा वेळ मिळाला होता आम्हा सात जणांना. गप्पांच्या ओघात बराच वेळ निघून गेला. रात्रही फार झालेली आणि डोळ्यांना झोप झोपवू लागलेली. त्यामुळे गुहेत शिरून प्रत्येकाने पांघरूण ओढून अंग टाकलं आणि अशाप्रकारे मदनगडाच्या कुशीत पहिल्या दिवसाची यथोचित सांगता होऊन आम्ही सर्व निद्राधीन झालो.

( तळटीप : उर्वरित ट्रेकची वारी लवकरच भाग - २ मध्ये... )

छायाचित्रे साभार :  अक्षय पाठारी व दुर्गेश चेंदवणकर.

- जान्हवी फुलवरे.
  [ मोरया ट्रेकर्स. ]

6 comments:

  1. भन्नाट blog Janhavi Fulware 🔥💞
    घरबसल्या अलंग मदनची सफर झाली.

    उर्वरित भाग लवकर येऊ दे

    ReplyDelete
  2. Chan... you guys are Rock....

    ReplyDelete
  3. पुन्हा,एकदा amk ट्रेक अनुभवता आला.जान्हवी खूप छान आणि सुंदर,अगदी प्रत्येक प्रसंग तू हुभेहून आपल्या शब्दात मांडला आहेस. वाचल्यानंतर पुन्हा एकदा मला amk ट्रेकला निघाले आहे असेच जाणवलं.आणि तुझी आणि सर्वांची साथ लाभली म्हणून मी सहज रित्या हा ट्रेक पूर्ण करू शकलो त्याबद्दल तुझा सहस्र आभारी 🙌 पुढचा भाग लवकरच पोस्ट कर.

    ReplyDelete